Sunday 25 December 2011

25-50-75=0

डॉ. मनोहर गजानन जोशी यांचे 25-50-75हे आत्मचरित्र वाचून सध्या आमची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे! यातल्या प्रत्येक आकडय़ानंतरच्या डॅश या वजाबाकीचेच चिन्ह असावेत असं पुस्तक वाचून वाटू लागतं. पण तो आपला नुसता अंदाज. कारण या आत्मचरित्राला महाराष्ट्राचे आधुनिक बखरकार बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. बाबासाहेब हाडाचे दुर्गप्रेमी असल्याने ते सतत या दुर्गावरून त्या दुर्गावरच ये-जा करत असतात. ही प्रस्तावनाही त्यांनी अशीच दुर्गादुर्गी ये-जा करताना लिहिली असावी! त्यात बाबासाहेबांचं शब्दलालित्य म्हणजे काय बहार राव? ते लिहितात, ‘तेव्हा शब्दांची फलटणच्या फलटण हात जोडून त्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणते मला घ्या, मला घ्या.अतिशयोक्ती, आत्मस्तुती, खोटा विनय, स्वत:ची खोटी वकिली अशा गोष्टी जोशीसाहेबांनी टाळल्या आहेत असा निर्वाळा बाबासाहेबांनी देऊन टाकला आहे. बाबासाहेबांपुढे जायची कुणाची बिशाद आहे राव? त्यामुळे आम्ही सर्व मजकूर वाचून  काढला आणि त्यात कुठेही अतिशयोक्ती, आत्मस्तुती, खोटा विनय, स्वत:ची वकिली अशा गोष्टी औषधालासुद्धा शोधून सापडणार नाहीत अशा निष्कर्षावर आलोत.
जोशीसाहेबांनी पुस्तकाचे जसे बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व याननुसार तीन भाग करून त्यात आपल्या आयुष्याची 25-50-75 वर्षाची वाटणी करून टाकली. त्यानुसार पुस्तकाचा मजकूर लिहिला आणि त्याच संख्येत स्वत:चे फोटोही सोबत छापले. जोशीसाहेबांचे स्वत:वर जसे निस्वार्थी आणि विनयशील प्रेम आहे तसेच त्यांचे इतर अनेक गोष्टींवरही प्रेम आहे. कारण त्यांची दृष्टीच मुळात भूतदयावादी आहे. त्यामुळे 150 पाने मजकुराची आणि 150 पाने फोटोंची अशी त्यांनी सरळ विभागणी केली आहे. या छायाचित्रांमध्ये सापशिडीचा खेळ, कुलदेवता अंबेजोगाई, ग्रामदेवता बापूजी, ग्रामदेवता अंबामाता, रायगड, गरम पाण्याचे झरे, महाड-पनवेलची शाळा, हुतात्मा स्मारक, बॅ. अंतुले, मुंबई महानगरपालिका, मार्टिन ल्यूथर किंग, येरवडा जेल, नायगरा धबधबा, इंदिरा गांधी, महाराष्ट्र विधानपरिषद, कुसुमाग्रज, मुंबई उच्च न्यायालय, बाबरी मशिद, एन्रॉनच्या रिबेका मार्क, सर्वोच्च न्यायालय, गिरीश व्यास यांची पुण्यातील वादग्रस्त इमारत, संसद भवन यांच्याही छायाचित्रांचा समावेश आहे. या सर्वाना सन्मानपूर्वक आपल्या आत्मचरित्रात स्थान दिल्याबद्दल त्यांनी जोशीसाहेबांना रॉयल्टी द्यायला हवी. शिवाय त्याचं स्थानही स्वयंभू आहे. त्यात जोशीसाहेब कुठेही अध्येमध्ये कडमडलेलेनाहीत. इतरांवरही प्रेम असावं तर असं. फक्त त्यात जोशीसाहेबांच्या नावे बाकी शून्य उरतं एवढाच काय तो बारकासा तोटा. पण एवढय़ा मोठय़ा कोहिनूरच्या मालकासाठी एवढुसा तोटा, किस झाड की पत्ती! 

केवढी ही स्वार्थपरायणता?

औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था आहे असं त्यांच्या हाऊस जर्नलमध्ये छापलेलं असतं आणि ग्रंथसूचीमध्येही. महाराष्ट्रातल्या रसिक वाचकांमध्ये मात्र या मान्यताप्राप्ततेचा पडताळा घेण्याची सोय नाही. कारण तो घेणार कसा? पण सरकार दरबारी मात्र साकेत प्रकाशनाचा जाम दबदबा आहे.
सरकारनं श्री. पु. भागवत यांच्या नावानं सुरू केलेला दुसराच पुरस्कार साकेत प्रकाशनाच्या बाबा भांड यांना मिळाला. नुकताच 16 डिसेंबरला मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा वि. पु. भागवत पुरस्कारही त्यांना देण्यात आला. तर अशा या साकेत प्रकाशनाच्या घौडदौडीत आणखी एका पराक्रमाची नुकतीच भर पडली आहे. साकेतचे 1426 वे पुस्तक (अबब! केवढी ही संख्या, वाचतानाच डोक्यावरचा घाम पुसावा लागतो राव!) प्रकाशित झाले आहे. हा बहुमान शिवराज गोर्ले यांच्या दुरंगीया कादंबरीला मिळाला आहे. गोर्लेसाहेब गेली काही दिवस नवनव्या पुस्तकांचे रंग उधळत असल्याने आम्ही जरा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आम्ही लगोलग दुकानात जाऊन पुस्तक विकत घेतलं. आता विकत घेतलेलं पुस्तक वाचायची सवय आम्हाला सुदैवानं असल्यानं आम्ही ते वाचू लागलो. तर हे आपलं कधीतरी वाचून झालंय असंच वाटू लागलं. म्हणजे ही कादंबरी कुणाच्यातरी कादंबरीवरून छापली आहे की काय असा प्रश्न आम्हा पामराला प्रश्न पडला. मग आम्ही गोर्लेसाहेबांची सगळीच्या सगळी पुस्तकं एका लायनीत बेजवार लावून ती नीट पडताळून पाहू लागलो. त्यात 1995 साली पुण्याच्या इंद्रायणी साहित्य या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली गोर्लेसाहेबांची सामनाही कादंबरी मिळाली. आणि आम्हाला काय आनंद झाला सांगू? ‘सामनाआणि दुरंगीडिट्टो सारख्या.
आवळ्याजावळ्या मुली असाव्यात तशा. फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे तेवढे सारखे नाहीत. आणखी एक बारका फरक असा की, दोन्हीच्या जन्मतारखाही सारख्या नाहीत. सामनाची आहे 1995 तर दुरंगीची आहे 2011. पण बाकी सारखंच. अगदी सेम टू सेम.
आता गंमत अशी आहे की, या दोन्ही कादंब-यांची मुखपृष्ठे वगळता त्यात काहीही बदल नाही. तेव्हा वि. पु. भागवत आणि    श्री. पु. भागवत यांच्या नावांचे पुरस्कार स्वीकारणा-या बाबा भांड यांच्यावर ही नैतिक जबाबदारी नाही का?  त्यांनी कादंबरी आधीची असेल तर तसा इनप्रिंटवर उल्लेख करायला हवा. पण त्यांनी तो न करता नवी आवृत्तीअसा केला आहे. शासकीय योजनांमध्ये पुस्तक खरेदी करताना पुस्तकाची नवी आवृत्ती घेतली जाते, पुर्नमुद्रित आवृत्ती घेतली जात नाही. तेव्हा गोर्लेसाहेबांची ही बहुमोल कादंबरी शासकीय पुस्तक योजनांमध्ये समाविष्ट झाली नाही, तर सरकारचा किती तोटा होणार नाही का? सरकारनं त्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून बहुधा भांड आणि गोर्लेसाहेबांनी ही काळजी घेतली असावी! किती ही दूरदृष्टी? केवढी ही नैतिकता आणि केवढी ही स्वार्थपरायणता? अहाहा, धन्य हो राजे हो, तुम्ही धन्य हो!

Saturday 3 December 2011

25, 50, 75

होशियार, कोहिनूरचे मालक, लोकसभेचे माजी स्पीकर, महाराष्ट्राचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांच्या धाकात वावरून वावरून कणा मऊ झालेले श्रीमान रा. रा. मनोहर जोशी सर यांनी आता लेखनकामाठी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मराठी लेखकांचं दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे हो? तेव्हा होशियार..
 
सरांनी राजकारणात उमेदवारी केली (तिथं त्यांची किती डाळ शिजली हा भाग वेगळा!), ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (काय केलं ते विचारू नका!), क्लासेस चालवले (त्यातली किती मुलं पास झाली हेही कृपा करून विचारू नये! ), इमारतीही बांधल्या (शू, त्याविषयी अजिबात बोलायचं नाही!) आणि आता सगळं करून झाल्यावर लेखनकामाठी सुरू केली आहे! परवाच गुरुजींच्या, त्रिकालाबाधित आणि भविष्यात अनंत वर्षे बाजारात राहण्याची शक्यता असलेल्या चार बहुमोल आणि आखुडशिंगी, बहुदुधी पुस्तकांचं मंबापुरीत प्रकाशन झालं.
 एकाच वेळी एका लेखकाची अनंत पुस्तकं प्रकाशित होण्याची ही काही पहिली वेळ नाही असं काही लोक कुत्सितपणे म्हणतील. मरोत ते!
सर लोकसभेचे स्पीकर होते, त्या काळात त्यांना सारखा मुंबई-दिल्ली प्रवास करावा लागत असे. विमानातल्या वेळात त्यांनी डायरी लिहिली. तिचं बी-वननावानं पुस्तक प्रकाशित केलं. ते मुंबईतल्या एका प्रकाशकानं प्रकाशित केलं होतं. पण त्यानंही ते न वाचताच छापलं असावं. त्यामुळे वाचकांनीही ते वाचलंच नाही असं म्हणतात! तसंही लोकसभेत स्पीकरला फार बोलण्याचं काम नसतं. बोलतात ते खासदार-मंत्री. स्पीकरला त्यांना आवरण्याचं काम करावं लागतं. म्हणून सरांनी डायरी लिहून आपली बोलण्याची हौस भागवली खरी, पण ते लोकसभेतल्या स्पीकरच्या खुर्चीत शातंपणे बसून असायचे तसेच राहिले असते तरी बरं झालं असतं, अशी नंतर बरेच दिवस चर्चा सुरू होती म्हणतात!
 
पण उडाले ते कावळे अणि राहिले ते मावळेअसा शिवसैनिकांचा बाणा असतो. सरांनी तर थेट शिवसेनेवर पीएच.डी.च केली आहे. केवढी ही मेहनत आणि केवढा हा अभ्यास? शिवाय तेवढंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी आपलं बहुमोल संशोधन पुस्तकरूपानेही उपलब्ध करून दिलं. त्यांचं ऋण महाराष्ट्रानं कसं फेडावं बरं? (की तसंच राहू द्यावं?) त्यांची ही तळमळ आणि अभ्यास पाहून आम्हाला कधी कधी भरून येतं! आता हेच पहा ना परवा त्यांनी एक-दोन नव्हे तर थेट चार पुस्तकं प्रकाशित केली आहेत. एक पुस्तक मुलाखतींचं आहे. पण ते सरांच्या नव्हे तर सरांनी घेतलेल्या इतरांच्या मुलाखतींचं. ज्यांचा व्यवसाय 100 कोटींचा आहे, त्यांच्या त्यात सरांनी मुलाखती घेतल्या आहेत म्हणे! दुसरं पुस्तक आहे सरांच्या राज्यसभेतील भाषणांचं. तिसरा त्यांचा एक थिसिस आहे.
 
..आणि चौथं सरांचं आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे, 25, 50, 75. हे काय नाव आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचा खुलासा असा आहे की, सरांनी या पुस्तकामध्ये जगण्याचा मूलमंत्र ठरावा असा सिद्धांत मांडला आहे. विशेष म्हणजे तो स्वत:च्या आयुष्यातल्या अनुभवांवरून मांडला असल्याने तो नाकारण्याचा सवाल येत नाही. उलट त्याबद्दल महाराष्ट्रानं त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तो सिद्धांत असा आहे की, वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत शिक्षण घ्यावं, पन्नासाव्या वर्षापर्यंत पैसे कमवावेत आणि पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत मौजमजा करावी. सर स्वत: असंच आयुष्य जगले. आपल्या आयुष्याचं इतकं काटेकोर नियोजन करणा-या सरांनी आत्मचरित्रातही कुठेही अघळपघळपणा केला नाही. त्याचं लेखन आणि मांडणी त्यांनी अगदी काटेकोर केली आहे. पंचविसाव्या वर्षापर्यंतच्या कालखंडाला त्यांनी फक्त पंचवीस पानंच दिली आहेत. शिवाय प्रत्येक पानावर एक फोटो आहे. पन्नासाव्या वर्षापर्यंतच्या भागासाठी  पन्नास पानं दिली आहेत. याभागातही प्रत्येक पानावर एक फोटो आहेच. शेवटच्या म्हणजे पंचाहत्तराव्या वर्षापर्यंतच्या कालखंडासाठी ७५ पानं आहेत. प्रत्येक पानावर एक फोटो आहेच. सरांचं स्वत:वर किती निर्व्याज आणि निस्वार्थी प्रेम आहे, त्याचा हा पुरावाच!
 म्हणजे गुरुजींनी शिक्षणासाठी 25 वर्ष खर्च केली, गडगंज संपत्ती कमावण्यासाठी 25 वर्ष खर्च केली आणि मौजमजा करण्यासाठीही पंचवीस वर्षे खर्च केली. 2 डिसेंबरला ते पंचाहत्तर वर्षाचे झाले. त्यामुळे आता गुरुजी काय करणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शिकून झालं, पैसे कमावूनही झाले आणि मौजमजा करूनही झाली. आता ते संन्यास घेण्यासाठी हिमालयात जातात की, आजवर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जातात, ते पाहायचं. आम्ही तर ज्याम एक्साइट झालोय बुवा त्यांचा भावी संकल्प ऐकण्यासाठी.

Sunday 20 November 2011

सुन्या सुन्या मैफलीत...

मराठी साहित्यक्षेत्रात सध्या ज्यामच सन्नाटा पसरला आहे. ‘बीभत्स गारठा’, ‘कानठळ्या बसवणारी शांतता’, ‘टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल अशी भयाण शांतता’ असंच या सन्नाटय़ाचं वर्णन करावं लागेल. या गोष्टीला दोन माणसं कारणीभूत आहेत. ती म्हणजे साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार वसंत आबाजी डहाके आणि प्रतिमा इंगोले. 16 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार. म्हणजेच आता मतपत्रिका मतदारांना रवाना केल्या गेल्या आहेत. पण ना निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला जातो आहे ना कुणी काही वाद निर्माण होतील अशी विधानं करत आहे. अशानं कसं होणार हो? संमेलनाची हवा तापणार तरी कशी?
 
दरवर्षी उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या की काही ना काही चर्चा, गावगप्पा आणि अफवा पसरायला सुरुवात होते..आणि त्याचबरोबर संमेलनाच्या वातावरण निर्मितीची रंगीत तालीम सुरू होते. कोण बेळगावचा प्रश्न सोडवण्याचं जाहीर करतं, तर कोण प्रत्यक्ष साहित्य महामंडळावरच टीकेची झोड उठवतं. गेल्या वर्षीच्या अध्यक्षांनी वयोवृद्ध साहित्यिकांसाठी आरोग्य निधीची टुम काढली होती. त्यासाठी बऱ्याच देणग्याही जमवल्या होत्या. (त्यांचं पुढे काय झालं हा तपशील अजून तरी जाहीर झालेला नाही.) तशी काहीच टुमही या उमेदवारांनी काढलेली नाही. किती ही अरसिकता! केवढा हा आपपरभाव!!
 संमेलनाचं वातावरण तापणारच नसेल तर मग लोकांना त्याबाबत उत्सुकता निर्माण होणार तरी कशी? सगळेच लोक काही संमेलनाला जात नाहीत हेही खरं, पण वर्तमानपत्रांतून काही ना काही वाद घडल्याशिवाय लोकांना महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कानाकोप-यात साहित्य संमेलन नामक उत्सव भरणार आहे, हे कळणार तरी कसं? किमान तो कळावा, यासाठी तरी चार-दोन वाद व्हायला हवेत. कुणी कुणाची तरी कुरापत काढायला हवी. कुणीच काहीच बोलणार नसेल तर मग काय फायदा?
आधीच्या संमेलनाच्या वेळेस अशी खिन्न आणि सुन्न करणारी शांतता नव्हती, म्हणूनच यावेळची शांतता प्रकर्षाने लक्षात येतेय आणि मुख्य म्हणजे ती आता खुपू लागली आहे. पायात मोडलेल्या काटय़ाचं खुपणं आणि या शांततेचं खुपणं सारखंच वेदनादायी आहे राव!
 
प्रा. रा. ग. जाधव, केशव मेश्राम, मारुती चितमपल्ली, अरुण साधू, म. द. हातकणंगलेकर, द. भि. कुलकर्णी, उत्तम कांबळे या सर्व संमेलनाध्यक्षांच्या वेळेस कसं वातावरण तयार झालं होतं, काही ना काही वाद झडले होते. आता तसं काहीच होत नाही. आनंद यादव महाबळेश्वरच्या संमेलनासाठी उभे राहिले तेव्हा तर किती मज्जा आली होती! ते निवडूनही आले, पण शेवटी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या कृपाशीर्वादाने संमेलन अध्यक्षा- शिवायच पार पडलं. शिवाय या प्रत्येक वेळी संमेलनाध्यक्षांपेक्षा   ठाले पाटील हेच जास्त चर्चेत राहिले होते. आता तर तसंही घडताना दिसत नाही. उषा तांबे महामंडळाच्या अध्यक्ष झाल्यापासून तर महामंडळाच्या निदान बैठका तरी होतात की नाही हेही सालं कळत नाही. सारं आपलं गुपूचप. बाई स्वभावानं शांत असल्या तरी इतका शांत(शहाण)पणा काही उपयोगाचा नाही. कारण असंच शांतपणे चालू राहिलं तर भविष्यात साहित्य संमेलनच बंद पडेल, याची मोठी चिंता काही चिंतातूरजंतूंना लागून राहिली आहे. ते बंद झालं तर कितीजणाचं काय काय नुकसान होईल, कुणाकुणाचे हप्ते, दुकानदाऱ्या बंदे होतील! केवढा मोठा अनर्थ ओढवेल!!
 
यात काही गंमत नाही बुवा! साहित्य संमेलनात वाद पाहिजेतच. त्याशिवाय मजा नाही. नाहीतर ते व्यासपीठ सुन्या सुन्या मैफलीसारखं रुक्ष रुक्ष होऊन जाईल की! लोकही तिकडे फिरकणार नाहीत. आणि लोकच फिरकणार नसतील तर मग संमेलनाची शोभा ती काय राहिली? मग ‘संमेलनाध्यक्षाची डायरी’, ‘संमेलनाध्यक्षाचे दिवस’, ‘संमेलनाध्यक्षाच्या 365 रात्री’, अशी पुस्तकं पाडली जाणार तरी कशी?
 यावर्षी तर संमेलन चंद्रपुरात म्हणजे विदर्भात, दोन्ही उमेदवारही विदर्भातलेच. त्यात गेली काही वर्षे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न डोकं वर काढतो आहे. त्याविषयी काही ठोस भूमिका घेऊन किमान काही मतांची बेगमी करायची संधी होती. पण तीही या उमेदवारांनी अजून घेतली नाही. विदर्भातल्या चंद्रपूरच्या आणि गडचिरोलीच्या काही भागात नक्षलवादानं जनसामान्यांना-आदिवासींना त्राहीमाम करून सोडलं आहे. त्याविषयीही दोघंही काही बोलत नाहीत. शिवाय डहाके तर स्वत:चा प्रचारही करत नाहीत. ते या काळात नर्मदा परिक्रमेला काय जातात, कुटुंबाबरोबर गोव्याला काय जातात, सगळंच आश्चर्यकारक आहे. उमेदवारानं किमान आपला तरी प्रचार करावा की नाही? केवढा हा अलिप्तपणा! किमान आपल्या साहित्यसेवेच्या माहितीपर पुस्तिका छापवून घेऊन - त्यात सर्व पुस्तकं, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या अर्पणपत्रिका, त्यांच्यावर वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये आलेली परीक्षणं, आजवर दिलेली भाषणं, केलेले परदेश दौरे, संमेलनं-सभा-कार्यक्रमांची निमंत्रणं, काही विद्यार्थ्यांनी केलेले एम.फील, पीएच.डी.चे प्रबंध अशी सर्व माहिती - ती किमान सर्व मतदारांना पाठवून त्यांना दीपवून टाकावं की नाही? तर तेही नाही.
बरं असं काहीही न करता डहाकेच निवडून येणार असे अनेकांनी गृहीत धरलं आहे. तसं झालं तर बरंच होईल म्हणा. निदान आधीचे संमेलनाध्यक्ष आत्मपरीक्षण करतील आणि उद्याचे संमेलनाध्यक्ष काही बोध घेतील. पण पक्की खात्री नाही हां, आपला अंदाज नुसता.
 तेव्हा मायबाप साहित्यिकांनो, महामंडळाच्या पदाधिका-यांनो आणि संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांनो, सावध रहा. इशारा ध्यानात घ्या. वेळीच काहीतरी कारवाई करा आणि हा बिभत्स गारठा संपवून टाका. तो तुमच्याही तब्येतीलाही बरा नाही आणि आमच्याही. उगाच थोरामोठय़ांचे आदर्श उराशी कवटाळून बसू नका. काही उपयोग नसतो त्यांचा. त्या बिनकामाच्या गोष्टी असतात. राजकीय नेता काय नि साहित्यिक काय, तो हातावर हात आणि पायावर पाय मारून बसला की, निष्क्रिय होत जातो. निष्क्रियता हे राजकारणातून आणि साहित्यकारणातून निवृत्त होण्याचं लक्षण असतं. निवृत्त माणसांची घरीही उपेक्षा होते आणि दारीही. त्यामुळे कार्यप्रवण राहा. ही कानठळ्या बसवणारी शांतता नकोशी झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस आम्हाला जेवण गोड लागत नाही की रात्री झोप येत नाही. चॅनेलवाले पोरंपोरीही दंडुके घेऊन आमच्याकडे फिरकत नाहीत. त्यामुळे आम्हाला नव्या कविताही सुचत नाहीत. अशीच आमची उपेक्षा होणार असेल तर मग आम्ही मतदान तर करणार नाहीच, पण अण्णा हजारेंसारखं उपोषणाला बसू दिल्लीत, तुमच्या विरोधात. कारण आम्हालाही न्याय हवा आहे!

Monday 7 November 2011

लाडक्यांचे दोडके

आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. पुलं आता हयात असते तर 92 वर्षाचे झाले असते. पण अकरा वर्षापूर्वीच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेला म्हणजे 12 जून 2000ला इहलोकाचा निरोप घेतला. त्याआधीची दहा वर्षे पुलंची होती असंही म्हणता येत नाही. कारण पार्किन्सनसारख्या आजाराशी आणि आयुष्यभराच्या दगदगीतून आलेला थकवा यांच्याशी सामना करण्यात त्यांचा तो शेवटचा काळ गेला. शिवाय त्यांचं गारुडही तेव्हा वयोपरत्वे ओसरलं होतंच. म्हणजे पुलंना जागतिकीकरणाचा तसा काही स्पर्श झालेला नव्हता. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाला सुरुवात झाली असली तरी, त्याची दृष्यरूपं ख-या अर्थानं जाणवू लागली ती 2000नंतर. तेव्हा तर पुलं आपल्यात नव्हतेच.
 
प्रसिद्धीच्या झोतात असलेली एखादी मोठी व्यक्ती गेली की, सर्वसाधारणपणे ‘..मोठी पोकळी निर्माण झाली’, ‘..मोठी हानी झाली’, ‘..न भरून येणारं नुकसान झालंअशी वाक्यं कोण कोण उच्चारत असतं. पुलं गेल्यावरही ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांकडून ऐकवली, लिहिली आणि उच्चारली गेलीच. पण खरी पोकळी, खरी हानी आणि खरं नुकसान झालं ते सुनीताबाईंचंच. शेवटी सात नोव्हेंबर 2009ला सुनीताबाईही गेल्या. म्हणजे आता त्यांना जाऊनही दोन वर्षे होतील.
 आता पुलं आणि सुनीताबाई यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा लसाविमसावि काढला तर काय निघतं, याच्याशी कुणाला काही सोयरसुतक दिसत नाही. आताही पुलंचं लिखाण वाचताना कुणाकुणाच्या पापण्यांच्या कडा ओलावत असतील किंवा तसे ओलावणारे लोक आपला अनुभव सांगायला पुढे येतील. शिवाय कुणाचं काहीही न वाचता, त्याच्या साहित्याबद्दल बेधडक विधानं करायची अशी हल्ली महाराष्ट्रात फॅशन आहेच. त्यात ती व्यक्ती हयात नसली की, मग थापांना पारावारच नसतो.
दुसरं म्हणजे पुलं आपल्याला हसवताहेत ना, मग हसून घ्या; पुलं टाळ्या घेणारी वक्तव्ये करताहेत ना, मग वाजवा टाळ्या; पुलंना सर्दी झालीय ना, मग काढा शिंका असा संपद्राय त्यांच्या हयातीत निर्माण झाला. कारण या लोकांना आपल्या अडाणीपणाला मानवणारंच पुलंचं व्हर्जनच हवं होतं. तेवढीच त्यांची अपेक्षा होती आणि आहे.
 
त्यामुळे पुलं गेल्यानंतरच्या अकरा वर्षात पुलंचे तथाकथित महोत्सव, पुलं सन्मान पुरस्कार आणि पुलकित सकाळी किंवा संध्याकाळी यांचं पेव फुटत राहिलं. एकुणात पुलंचा इव्हेंट करण्याचा कार्यक्रम बिनबोभाट चालू राहिला. खरं म्हणजे पुलं काही जागतिकीकरणाचं प्रॉडक्ट नाहीत, पण जागतिकीकरणात स्वत:चं गि-हाईककरून घेतलेल्या लोकांनी पुलंचं प्रॉडक्टीकरण केलं!
 
जेजुरीला जसा खंडोबा-म्हाळसाबाईच्या नावानं बेलभंडारा उधळून उधळून तिथली माणसं हळदीच्याच रंगाची होऊन जातात आणि मग त्यांच्या कपडय़ावरून, चेह-यावरून त्यांना ओळखणं दुरापास्त होतं, तसंच पुलंच्या नावाचा बेलभंडारा उधळून स्वत:ची पोळी भाजवणा-यांचंही आहे. ते सगळे एकसारखेच दिसायला लागले आहेत. त्यात काहीच फरक दिसत नाही. म्हणजे हे पिठाच्या गिरणीसारखं आहे. त्यात गहू टाका, ज्वारी टाका, बाजरी टाका, सगळ्यांचं एकसारखंच पीठ होणार! आणि तेच लोक आपली पाठ आपणच थोपटून घेत राहणार! पुलं माणूस म्हणून मोठे होतेअसं सामान्य विधान नाना पाटेकर करतात, आणि वृत्तवाहिन्या त्यांचं पुल महोत्सवातलं आख्खं भाषणच ऐकवतात. हल्ली नाना कुठल्याही कार्यक्रमात गेले की, मला नाटकात काम करायचंय, अमुकचं नाटक करायचंय, तमुकची भूमिका करायचीय, असं म्हणून लोकांच्या टाळ्या घेतात. पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. तरीही नाना बोलतात त्याची बातमी होते.  
 
तर मुद्दा आहे, पुलंच्या नावानं जगणा-या लोकांचा. श्रीकांत मोघेंसारखे लोक पुलंच्या नावावरच मोठे झाले आणि पुण्याचा आशय फिल्म क्लबनं पुलं महोत्सव करून बरेच पुलं सन्मान पुरस्कार वाटले. आता त्यांना कंटाळा आला असावा किंवा कार्यक्रमातून पुरेसा पैसा मिळत नसावा. पण कार्यक्रम काही बंद पडले नाहीत. ते चालूच आहेत.
 
या लोकांना पुलंचे दोडकेम्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी पुलंना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्वअशी महोमहापाध्यायतोडीची उपाधी दिली आहे. कुणी म्हणेल की हा फार सोयीस्करपणा झाला. पण तो फायद्याचा आहे. कारण पुलंच्या नावाचं दुकान मांडून आपला गल्ला भरता येतो. पुलंच्या साहित्यिक योगदानाचा लसाविमसावि काढायचा तर त्यांची पुस्तकं वाचावी लागणार, एकदाच नाहीतर पुन्हा पुन्हा वाचावी लागणार, पुलंच्या बहराचा काळ आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा अभ्यास करावा लागणार. एवढा वेळ कुणाकडे आहे? नाहीतर आतापर्यंत पुलंचं एखादं किमान वाचनीय म्हणावं इतपत बाळबोध चरित्र तरी कुणी लिहिलं नसतं का? महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व एखाद्या बाळबोध चरित्राचाही विषय होऊ नये?
 
पुलंनी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीया जगप्रसिद्ध पुस्तकाचा एका कोळियानेया भनगड नावाने अनुवाद केला. पुलं मलाव्यच असल्यामुळे त्यांच्या दोडक्यांनी त्याच्याविरोधात ब्रही काढला नाही. आणि बहुधा ते वाचलंही नसावं. पण त्यांना एका कोळियानेहे शब्द एवढे आवडले की, ‘एका खेळियाने’, ‘एका साळियानेअशी ढापाढापी चालू केली.
 त्यामुळे पुलंची श्रीशिल्लक अशाच पद्धतीने राहणार यात काही वाद नाही. पुलं त्यांच्या नावानं टाळकुटय़ा आणि मेणबत्त्या पेटव्या लोकांचेच उत्सवमूर्ती राहणार! कारण तीच त्यांची खरी ओळख. त्यांचं साहित्यिक म्हणून काहीएक योगदान होतं का, याच्यापेक्षा पुलं परफॉर्मर होते, हे मिरवायला सोपं आणि सोयीचं आहे. त्यामुळे त्यांच्या नावे महोत्सव करता येतो. त्यामुळे पुलंच्या नावाने उत्सव होत राहतील, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील, त्यांच्यासारखा गेटअप करून त्यांचे एकपात्री प्रयोग सादर होतील, त्यांची जवळपास सगळी परभृत नाटकं पुन्हा पुन्हा नव्या संचांत येत राहतील. पण पुलंचं पुन्हा पुन्हा पुनर्मूल्यांकन करायला फारसं कुणी (त्यातल्या त्यात शहाणा माणूस!) धजावणार नाही. भविष्यकाळात कुणी तसा प्रयत्न केलाच तर (व्यक्ती आणि वल्लीआणि मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहासही दोन पुस्तकं वगळता), हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीमधल्या म्हाता-याच्या हाती शेवटी माशाच्या हाडांचा सापळाच उरला तसाच सापळा उरेल. हे जाणून असलेले लोक त्या मार्गाला जाणार नाहीत आणि गेले तरी ते मान्यही होणार नाही. त्यामुळे पुलंचे सोंगाडेआणि बाताडेहेच व्हर्जनच टिकून राहणार. ते पुलंचंच प्रारब्ध असल्यानं त्याला तुम्ही-आम्ही काय करणार?

Saturday 22 October 2011

टाकसाळे तुम्हीसुद्धा?

गोष्ट फेसबुकवरची आहे. या फेसबुकवर - मराठी भाषेत म्हणायचे तर चावडीवर - एकंदर ज्या पद्धतीच्या आणि ज्या वकुबाच्या कमेंट पास केल्या जातात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा नाहीच तर वाचायच्याही लायकीच्या नसतात. तरीसुद्धा बरेचसे लोक आपण सॉक्रेटिस, आइनस्टाइन, कार्ल मार्क्‍स,   डॉ. आंबेडकर, नरहर कुरुंदकर यांच्यापेक्षाही बुद्धिमान आहोत अशा थाटात कमेंटाकमेंटी करत असतात. मूळ विषय काय, हे न पाहता आपली अक्कल पाजळत असतात. त्यातून त्यांना आनंद वगैरे मिळत असावा. नेटरवरच्या अशा ब-याच साइटसना ‘सोशल नेटवर्किंग साइटस’ असे उच्चभ्रू नाव काही रिकामटेकडय़ा मंडळींनी ठेवले आहेच, त्यामुळे अशा कमेंटाकमेंटीतून या लोकांचे सोशल नेटवर्क वाढत असावे. पृथ्वीचा आकार जसा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाच असतो, तसेच कुणाला काय वाटावे (किंवा त्याने वाटून घ्यावे) हा प्रश्नही ज्याच्या त्याच्या वकुबाचा असतो.
 
स्वभावाने, प्रकृतीने आणि लेखनधर्मानेही मूलत: गंभीर असणा-या मुकुंद टाकसाळे यांचे फेसबुकवर आगमन झाल्याला बरेच दिवस झाले. मध्यंतरी त्यांनी फेसबुकवर खूप वेळ वाया जातो, म्हणून तिथून एग्झिटही घेतली होती. पण त्यांना काय वाटले कुणास दखल, त्यांनी पुन्हा एंट्री मारली. सगळ्या गोष्टींकडे गंभीरपणे पाहणारी टाकसाळे यांच्यासारखी पाच-दहा लोकं फेसबुकवर सापडतात, तेव्हा बरेच वाटते. बुडत्याला काडीचा आधार असतो, तसा मराठी लोकांच्या फेसबुकवरच्या उठवळ भाऊगर्दीत टाकसाळे यांच्यासारखे काही लोक आधार असतात, असे आम्ही आपले सुरुवातीपासून मानत आलो. पण ‘मी कुठलीही गोष्ट गृहीत धरत नाही आणि इतरांनाही धरू देत नाही’ हे वाक्य कुठेतरी टाकसाळे यांच्या वाचनात आले असावे. ते त्यांनी लगेच अमलात आणायचे ठरवले. मात्र, त्यासाठी निवड केली ती फेसबुकची. त्यामुळे त्याचा बभ्रा व्हायचा तो झालाच.
 
तर गोष्ट अशी की, दिवाळी अगदी तोंडावर आल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी सालाबादाप्रमाणे आपल्या दिवाळी अंकांच्या सवलत योजना जाहीर केल्या. त्यानुसार मॅजेस्टिकनेही आपला सवलत संच जाहीर केला. त्या संचात नेहमीप्रमाणे ‘मौज’, ‘दीपावली’, ‘अक्षर’, ‘कालनिर्णय सांस्कृतिक’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘अनुभव’ या सहा दिवाळी अंकांचा संच आहे. संचाची 25 ऑक्टोबपर्यंत आगावू नोंदणी करणा-यांना तो सवलतीत दिला जाणार असून त्यासोबत ‘पोटच्या पोरी नाहीशा होत आहेत’ (गीता अरवामुदन), ‘राधेने ओढला पाय..’(मुकुंद टाकसाळे), ‘पुढल्या हाका..’ (सुबोध जावडेकर) आणि ‘आरोग्यसंपन्न आधुनिक जीवनाकरिता आयुर्वेद’ (शुभदा पटवर्धन) या चार पुस्तकांपैकी कुठलेही एक पुस्तक भेट मिळणार आहे.
 
..तर या संचाची जाहिरात मॅजेस्टिकने फेसबुकवर केली. त्यावर टाकसाळे यांनी 5 ऑक्टोबरला कमेंट केली की, ‘‘हा संच खरंच विकत घेण्याजोगा आहे. एक तर सारे अंक दर्जेदार आहेत. आणि त्याबरोबर दिली जाणारी पुस्तकंही दर्जेदार आहेत (इथे त्यांनी स्माइली टाकले आहे.) मी माझे पैसे पाठवले. तुम्ही???’’ त्यावर एक-दोन फेसबुकभाऊंनी लगेच, ‘आय अ‍ॅम नेक्स्ट’, ‘आय अ‍ॅम डुइंग सो’ अशी कमेंटाकमेंटी केली. प्रत्यक्षात संच बुक केला की नाही माहीत नाही. तर ते असो. पण अजून काही भाऊंनी आपल्या कोकरउडय़ा मारायच्या आधीच औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ या प्रकाशन-विक्री संस्थेच्या श्रीकांत उमरीकरांनी टाकसाळे यांच्यावर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी कमेंट केली, ‘‘मोठं आश्चर्य आहे! टाकसाळे यांचं स्व:चं पुस्तक या योजनेत आहे. ते मॅजेस्टिकचे लेखक आहेत. ललितमध्येही त्यांचं लेखन नियमित असते आणि तेच याची जाहिरात करत आहेत. आपले पुस्तक आपणच खरेदी करून त्याची जाहिरात लेखकाला करावी वाटत असेल तर याला काय म्हणावे? टाकसाळेंसारख्या वाङ्मयीन संस्कृतीची गंभीर जाण असणा-यांकडून तरी असले उठवळ चाळे अपेक्षित नाहीत.’’
 
उमरीकरांनी मुंबई-पुण्याबाहेरच्या प्रकाशकांना येणारे अनुभव, ग्रंथांच्या प्रसाराबाबतीतील अडचणी अशा ब-याच गोष्टींचा पाढा त्यानिमित्ताने वाचला. त्यावर परत काही फेसबुकभाऊंनी कोकरउडय़ा मारल्या-‘बरोबर आहे, बरोबर आहे’, ‘बरोबर नाही’.
 
आता फेसबुकवर आपल्या नावाने काय लाह्या फुटताहेत हे टाकसाळे यांच्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, उशिरा लक्षात आले. मग त्यांनी खुलासा केला, ‘‘श्रीकांत.. दिवाळी अंकांचा संच त्यांनी चांगला दिलेला आहे, हे खरंच आहे. त्यात माझं पुस्तक आहे, हा योगायोगाचा भाग. तो नसता तरी मी हेच लिहिलं असतं.. अनेकदा आपल्याला हवे ते अंक नेमके एकत्र नसतात. मग नाइलाज म्हणून कुठला तरी एखादा नको असलेला अंक गळ्यात मारून घ्यावा लागतो. तसं इथं होणार नाही. दर्जेदार दिवाळी अंक घेणा-यांना जे अंक नेमके हवे असतात, ते इथं आहेत, एवढंच मला म्हणायचं आहे..’’
 
टाकसाळे यांचा हा खुलासा वाचून ‘ज्युलिअस सीझर’ या शेक्सपिअरच्या नाटकातील सीझरचे ते प्रसिद्ध वाक्य - ‘ब्रूटस यू टू?’ - आठवले. टाकसाळे यांच्या गुणात्मक आणि दर्जेदार लेखनाबद्दल काहीच वाद नाही. म्हणूनच उमरीकरांनी त्यांच्याकडून सार्वजनिक विधानं करताना तारतम्याची अपेक्षा केली, ती वाजवीच म्हटली पाहिजे. पण टाकसाळे यांनी जो खुलासा केला तो, ब्रुटस यू टु? याचीच पुन्हा आठवण करून देणारा ठरला. कारण जे अंक अजून म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत बाजारात आलेलेच नसणार, त्यांना न पाहताच, न वाचताच टाकसाळे यांनी केवळ पूर्वेतिहासावरून यंदाही ‘दर्जेदार’ ठरवून टाकले. दुसरी गोष्ट मॅजेस्टिकच्या संचात हे अंक निदान अलीकडच्या काही वर्षात तरी असतातच असतात, ते याच वर्षी आहेत, असे अजिबात नाही. म्हणजे गेल्यावर्षीपर्यंत हा संच दर्जेदार नसायचा की काय? शिवाय ‘मौज’चा अंक आहे म्हणून तो दर्जेदारच आहे किंवा ‘अक्षर’ आहे म्हणून तो दर्जेदारच आहे, असा दावा करणं (प्रकाशनाआधीच तरी) वस्तुस्थितीला धरून नाही. आता ज्या अंकांत एखाद-दुसरा चांगला लेख (किंवा कथा) तो अंक दर्जेदार अशी तर टाकसाळे यांची दर्जाची व्याख्या नाही ना? पण अंक प्रसिद्ध व्हायच्या आधीच त्यांना सर्टीफिकेट देणे हा त्यांच्या पूर्वपुण्याईचा भाग की दबदब्याचा? आणि त्याला टाकसाळे यांनी भुलावे?
टाकसाळे यू टू?
हेच या संचासोबत भेट मिळणा-या पुस्तकांबाबतही आहे. प्रत्येक संचासोबत चारपैकी आपल्या आवडीचे कोणतेही एकच पुस्तक भेट मिळणार आहे. पण टाकसाळे यांनी सा-याच पुस्तकांना मिष्किलपणे का होईना पण दर्जेदार ठरवून टाकल्याने पंचाईत झाली आहे. कारण संचासोबत चारही पुस्तकं भेट मिळणार नाहीत. थोडा निर्लज्जपणा करून मागितली तरी मॅजेस्टिकवाले म्हणणार, ‘साहेब, संच घ्यायचा तर घ्या, नाहीतर फुटा.’ म्हणजे उरलेली तीन पुस्तकं विकत घ्यावी लागणार!
 
त्यात टाकसाळे आयुर्वेदावरच्या पुस्तकालाही दर्जेदार ठरवून मोकळे झाले आहेत. त्यात खरेही आहे म्हणा. कारण संच विकत घेणारे बहुतांश लोक उपयुक्तता मूल्य पाहून भेट पुस्तक म्हणून याच पुस्तकाची निवड करणार. त्यामुळे उरलेल्या तिन्ही पुस्तकांना टाकसाळे यांनी दर्जेदार ठरवूनही त्याचा फारसा फायदा होणार नाही.
 अहो, टाकसाळे आपले शब्द किमान वाया जाणार नाहीत, याची तरी काळजी घ्या. बाकी चूकभूल द्यावी घ्यावी लागतेच हो!

Sunday 9 October 2011

प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे

साहित्य संमेलनाची नौका एकदाची चंद्रपूरच्या किना-याला लागली तेव्हा किमान काही साहित्य रसिकांनी सुटेकचा श्वास घेतला असेल, काहीनी उच्छवासही टाकला असेल. आता संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोण कोण उभं राहणार, याची उत्सुकता काहींना दरवर्षीप्रमाणे लागली आहे. मागच्या आठवडय़ात ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्य परिषद, पुणे आणि मुंबई साहित्य संघ या दोन्ही ठिकाणांहून आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. विदर्भातल्याच लेखिका प्रतिमा इंगोले यांनी अर्ज भरला आहे. याशिवाय विठ्ठल वाघ, सुरेश द्वादशीवार यांचीही नावं चर्चेत आहेत. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही या मैदानात आश्चर्यकारकरित्या उडी घेतली आहे. पण नेहमीप्रमाणे आपल्या खुज्या अस्मितांचं प्रदर्शन करणारी - म्हणजे संमेलन विदर्भात आहे तर विदर्भातलाच संमेलनाध्यक्ष हवा - अशी चर्चाही सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात सोलापूर, सांगली, पुणे, ठाणे अशा ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळीही ही चर्चा होतीच. एकीकडे मराठी ज्ञानभाषा करायच्या बढाया मारायच्या, मराठी सातासमुद्रापार पोहचल्याच्या गप्पा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र साहित्य संमेलनाचं नेतृत्व करायची वेळ आली की, आपल्याच भागातला संमेलनाध्यक्ष हवा, असा आग्रह धरायचा! हा सरळ सरळ दुटप्पीपणा आहे. यातून आपण आपल्या संकुचित आणि प्रादेशिक मनोवृत्तीचंच दर्शन घडवत आहोत याचंही साधं भान ठेवायचं नाही!!
 
त्यामुळे या प्रकारातून संमेलनाध्यक्ष या पदाचंच अवमूल्यन होत आहे, हेही कुणाच्या लक्षात येत नाही. कुणाला ते जाणून घेण्याची इच्छाही नाही, हे सर्वात दु:खद आहे. मराठी साहित्य संमेलन हे किमान नावावरून तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात जिथं जिथं मराठी लोक आहेत, ते सर्व या संमेलनात सहभागी होतील, किमान त्यांनी सहभागी व्हावं. त्यामुळेच सुरुवातीच्या काळापासून हे संमेलन महाराष्ट्राबाहेर घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. 1909 साली बडोद्यापासून ही सुरुवात झाली, ती पुढे ग्वाल्हेर, बेळगाव, हैदराबाद, इंदूर, अहमदाबाद, दिल्ली, भोपाळ, रायपूर, पणजी, अशा ठिकाणी संमेलने भरवण्यापर्यंत विस्तारत गेली. पण 2001  साली विजया राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इंदूरला संमेलन झालं आणि तिथपासून संमेलनाचा परीघ आक्रसून तो महाराष्ट्रापुरताच मर्यादित झाला.
 
यावर्षी आधी बडोद्याहून निमंत्रण आल्यानं हे केंद्र परत महाराष्ट्राबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण मराठी माणसं महाराष्ट्राच्या बाहेर गेली म्हणून त्यांच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षा सुधारल्या असं होत नाही. महाराष्ट्रातल्या यच्चयावत साहित्य संस्थाप्रमाणे बडोद्याचीही संस्था वैयक्तिक हेवेदावे आणि कुरघोडीच्या राजकारणानं पोखरली असल्यानं त्याचं पर्यवसान सुंदोपसुंदीत होऊन अखेर त्यांना संमेलन भरवण्यात असमर्थता व्यक्त करावी लागली. मग संमेलन घेता का संमेलन?’ म्हणत साहित्य महामंडळाला अनेकांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. शेवटी ते एकदाचं चंद्रपूरने संमेलन भरवण्याचं निमंत्रण स्वीकारलं. पण विदर्भातल्या साहित्याच्या स्वयंघोषित रखवालदारांना संमेलनाध्यक्षही त्यांचाच हवा आणि संमेलनही त्यांच्याच गावात हवं. ही कोती मानसिकता फक्त विदर्भातच आहे, असंही नाही. अलीकडच्या काळात संमेलन भरवलेल्या सगळ्याच शहरं-गावांनी ती त्या त्या वेळी जाहीर केलेली आहे. आताही विदर्भ साहित्य संघानं आपला पाठिंबा धर्माधिकारींना जाहीर करून स्वत:चं बौद्धिक दारिद्र्य उघड केलं आहे.
 
असाच प्रकार चालू राहणार असेल तर संमेलनाच्या नावातून अखिल भारतीयहे दोन शब्द काढून टाकले पाहिजेत. आपलं जग इतकं मर्यादित असेल तर आपण किमान सर्वसमावेशकतेच्या गावगप्पा मारू नयेत. कारण त्यातून आपलीच यत्ताउघड होते.
 
दुसरी गोष्ट म्हणजे संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आपला बेलगाम घोडा दामटवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते मूळचे विदर्भाचे आहेत, त्यामुळे त्यांना हे ब्लॅकमेलिंग जमण्याची शक्यता खुणावू लागली आहे. पण त्यांना सर्वसंमतीनं आणि निवडणूक न होता म्हणजे बिनविरोध संमेलनाध्यक्षपद हवं आहे. याचे तीन अर्थ होतात. एक, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्या धर्माधिकारींचा लोकशाही मार्गानं होणाऱ्या निवडणुकीवर विश्वास नसावा वा निवडणूक घेतली तर आपण निवडून येऊ याची त्यांना खात्री वाटत नसावी. दोन, धर्माधिकारी यांनी स्वत:च असं जाहीर करणं म्हणजे आपलं कर्तृत्व वादातीत आहे, तेव्हा त्याला सर्व साहित्य रसिकांनी मान्यता द्यायला हवी. तीन, धर्माधिकारी विदर्भाचेच असल्याने त्यांना सहानुभूती मिळेलही. पण त्यांची साहित्यिक कामगिरी संमेलनाच्या अध्यपदावर दावा सांगण्याएवढी आहे काय? आपले वडील (गांधीवादी नेते) दादा धर्माधिकारी यांची पूर्वपुण्याई एवढेच धर्माधिकारांचे  भांडवल आहे. त्यांनी काही पुस्तकं लिहिली असली तरी त्याला कुणीही साहित्य म्हणणार नाही आणि एवढी एकच गोष्ट गुणवत्तेच्या पातळीवर निर्विवाद होण्यासारखी नाही. शिवाय धर्माधिकारी सध्या एका सरकारी समितीचे काम पाहतात. त्यामुळे त्यांनी खरं तर संमेलनाध्यक्षपदाची इच्छा बाळगणं, हेच मुळात न्याय्य नाही आणि नैतिक तर नाहीच नाही. माझं आडनाव धर्माधिकारी असल्यानं मला कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार आहेअसं आपल्या भाषणांत उच्चरवानं सांगणा-या आणि त्या भाषणांत आपल्या वडिलांपासून पत्नीपर्यंत आणि मुलांपासून नातवंडांपर्यंत सर्वाची सदासर्वदा स्तुती करणा-या आत्मलुब्ध आणि आत्ममग्न धर्माधिकारींचं हे वर्तन त्यांचीच शोभाकरणारं आहे. त्यामुळे त्यांनी
 
अभ्यासेनी प्रगटावे ।
ना तरी झाकोनी राहावे ।
प्रगटोनी नासावे ।
हे बरे नव्हे ।।
हे समर्थवचन लक्षात ठेवावं.. आणि संमेलनाध्यक्ष विदर्भातलाच हवाअसे अकलेचे तारे तोडणा-यांनीही.

Sunday 25 September 2011

संमेलनाची ससेहोलपट!

बडोद्याच्या साहित्य परिषदेनं आधी संमेलनाचं निमंत्रण स्वीकारून नंतर नाकारल्यावर त्या परिषदेच्या नेतृत्वाचा हेकेखोरपणा उघड झाला, तशीच साहित्य महामंडळाची दिवाळखोरीही. औरंगाबादमधील उंडणगाव या छोटय़ा गावानंही साहित्य संमेलन भरवल्याची तयारी दाखवली होती. पण एवढय़ा छोटय़ा गावी संमेलन कसं भरवायचं म्हणून त्यांच्या आमंत्रणाचा विचार करता येणार नाही असं महामंडळानं कळवल्यावर त्या गावच्या ग्रामस्थांनी कौतिकराव ठाले पाटील यांचा पुतळा जाळला. खरं तर आता काही कौतिकराव महामंडळाचे अध्यक्ष नाहीत. उषा तांबे यांच्याकडे अध्यक्षपदाची खुर्ची आहे. पण तांबेबाई पडल्या भिडस्त, त्यामुळे ठाले पाटलांची तोंटपाटीलकी आणि दांडगटशाही यांना काही त्या लगाम घालू शकत नाहीत. त्यामुळे ठाले पाटील यांचाच महामंडळावर प्रभाव आहे. शिवाय संपर्क ही प्रभावाची आणि राजकारणाची गुरुकिल्ली असते. तेही ठाले पाटलांकडे आहेच. ठाले पाटील पक्के राजकारणी गृहस्थ आहेत. अन्यथा साहित्य संमेलनाची नौका चंद्रपूरच्या किना-यालाही लागणं शक्य नव्हतं. विदर्भातली साहित्य परिषद आणि ठाले पाटील यांच्यामधून विस्तव जात नव्हता, ही परिस्थिती भूतकाळातली नाही तर अलीकडच्या वर्तमानकाळातलीच आहे. या परिषदेचा विदर्भात बराच दबदबा आहे. त्यांनी ‘विदर्भात कुठेही साहित्य संमेलन भरू देणार नाही’ असा पण केला असता आणि प्रयत्न केले असते तर त्यांना ते अवघड नव्हतं. पण ठाले पाटीलांशी जुनं वैर फेडायचं सोडून त्यांनी जुळवून घेतलं. शिवाय तांबेबाईंशी काही त्यांचं वाकडं नाही. वाकडय़ात न शिरणा-या कुणाशीच कुणाचं वाकडं नसतं, हा सरळ नियम विदर्भवाल्यांचा असावा. पण बडोद्याच्या नकारानंतर संमेलन भरवण्यासाठी महामंडळाला अनेकांच्या नाकदु-या काढाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. हे त्यांच्या दारिद्रय़ाचं लक्षण की महाराष्ट्राच्या? खरं तर ते महामंडळाच्याच म्हटलं पाहिजे. कारण दुस-या दर्जाची माणसं तिय्यम दर्जाचीच कामगिरी करत असतील तर त्यांच्याविषयी कुणाला आस्था असण्याचं काय कारण?
 पण संमेलन चंद्रपुरात होत आहे या बातमीनं काही कुणाला फार आनंद झालेला दिसत नाही. चंद्रपूर शहर जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी तसं ग्रामीणच. शिवाय काहीसं दुर्गम. त्यामुळे तिथं जायला किती साहित्यिक तयार होतील हाही प्रश्नच आहे. शिवाय विदर्भामध्ये अलीकडे जी फुटून निघण्याची भाषा काही थोडय़ाथोडक्यांकडून केली जात आहे, त्यांचे नगारे या संमेलनात वाजण्याची दाट शक्यता आहे. साहित्य संमेलनाला आता राजकारणाचं वावडं राहिलं नाही हे खरं पण ‘ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी’ या न्यायानं विदर्भाच्या लोकांनी संमेलनाचा अध्यक्ष विदर्भातलाच हवा अशी मागणी केली तर पुण्या-मुंबईतल्या काही असंतुष्ट आत्म्यांची या वर्षीचीही संधी बोंबललीच की! आधीच संमेलनाध्यक्षपद रूढार्थानं साहित्यिक नसणा-याकडं गेलं, ते खेचून परत सर्जनशील लेखकांकडे आणायचं असा पण काहींनी केलेला आहे, असंही म्हटलं जातं. त्यामुळे आता संमेलनाच्या मांडवाखाली कुणाची पालखी दाखल होते, ते पाहायचं. साल्लं, विदर्भ, त्यात चंद्रपूर का काय म्हणत्यात, तिथं नक्षलवाद्यांचं भ्या असतं का राव? अध्यक्षपद मिळायचं पण एकाद्या नक्षलवाद्यानं नरडय़ाला बंदूक लावली तर कितीला पडायचं ते अध्यक्षपद? जरा, चौकशी केलेली बरी म्हणून काही लोक त्या परिसराचा भूगोल समजून घेत आहेत असं म्हणतात!

Tuesday 6 September 2011

संतापकीय २८ ऑगस्ट


संतापकीय ३१ जुलै


संतापकीय १७ जुलै


संतापकीय ३ जुलै


संतापकीय १९ जून


संतापकीय ५ जून


संतापकीय २२ मे


संतापकीय ८ मे


संतापकीय २४ एप्रिल


संतापकीय १० एप्रील


संतापकीय २७ मार्च


संतापकीय १३ मार्च


संतापकीय २७ फेब्रुवारी २०११